कृती (१) लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
कृती (१) | Q 4.1 | Page 58
1) लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती.
SOLUTION
लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती.(√)
2) लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली.
SOLUTION
लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली. (×)
3) लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती.
SOLUTION
लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती. (√)
4) अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत.
SOLUTION
अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत. (√)
5) प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती.
SOLUTION
प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती. (√)
6) नवनिर्मितीक्षमता हा त्यांचा गुण होता.
SOLUTION
नवनिर्मितीक्षमता हा त्यांचा गुण होता. (√)
7) इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती.
SOLUTION
इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती. (√)
कृती (२ वर्णनकरा.
कृती (२) | Q 1 | Page 58
1) वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंबप्रमुख.
SOLUTION
चित्रकलेच्या प्रदर्शनाला साधारणपणे सुशिक्षित व उच्चभ्रू वर्गातील लोक जास्त असतात. ग्रामीण भागातील लोक तर अशा प्रदर्शनांकडे सहसा फिरकत नाहीत. मात्र वाई येथे लेखकांनी भरवलेल्या स्वत:च्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला शेतकरी कुटुंबातील थोडीथोडकी नव्हेत, तर चक्क वीस-बावीस माणसे भेट देण्यासाठी आली होती. त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना हे प्रदर्शन दाखवण्यासाठी घेऊन आला होता.
त्या शेतकरी कुटुंबप्रमुखाचे वय सत्तरीच्या आसपास होते. पांढऱ्या मिशा, रंग काळाकभिन्न, डोक्याला खूप मोठे बांधलेले मुंडासे असा नखशिखान्त शेतकरी पण अंगावर वागवीत होता. असा हा कुटुंबप्रमुख सर्वांना व्यंगचित्र समजावून सांगत होता. तो एकेका चित्रासमोर उभा राही आणि त्याला समजलेला चित्राचा अर्थ स्वत:च्या माणसांना समजावून सांगे. मुलानातवंडापासून लहानथोर सोबत आलेले ते कुटुंबीय आपल्या प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली चित्रांचा आस्वाद घेत होती. हे दृश्यच विलक्षण व दुर्मीळ होते. लेखकांच्या मनातली चित्र काढण्यामागील कल्पना आणि त्या कुटुंबप्रमुखाला जाणवलेला अर्थ यांतली तफावत लेखक समजावून घेत होते. फार मोठे अनौपचारिक शिक्षण लेखकांना या प्रसंगातून मिळत होते.
2) स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर
SOLUTION
लेखक एका कार्यक्रमाला गेले होते. पाहुणे म्हणून त्यांना पुष्पगुच्छ व नारळ दिला गेला. तो नारळ टेबलावर ठेवला. लेखक त्या नारळाचे निरीक्षण करीत बसले. त्या नारळात त्यांना चिमुरड्या मुलीचे डोके भासले. त्यांना नारळावरून, देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. हा प्रसंग आठवला. एवढ्या तपशिलाच्या आधारे त्यांनी स्त्रीभ्रूणहत्येविरुद्धचे पोस्टर तयार केले. एक पुरुषी हात. त्या हातात नारळ, नारळात मुलीचे रूप भासावे म्हणून बारीकसा कानातला डूल दाखवला. तो हात वरून खाली या दिशेने येत दगडावर नारळ फोडणार होता. तेवढ्यात एका तरुण हाताने तो पुरुषी हात अडवला. चिमुरड्या मुलींची, भ्रूणाची हत्या होऊ न देण्याचा निर्धार त्या चित्रातून व्यक्त झाला.
3) लेखकांनी रेखाटलेले आईचे काव्यात्म चित्र.
SOLUTION
लेखकांनी आईचे, आईच्या प्रेममय हृदयाचे अत्यंत हृदय चित्र रेखाटले आहे. चित्रातल्या परिसरात वैशाखातला वणवा पेटला आहे. त्यात एक सुकलेले झाड आहे. त्या झाडावर एकही पान नाही. अत्यंत भकास वातावरण आहे. तरीही त्या झाडावर एका पक्ष्याचे घरटे बांधले आहे. त्या घरट्यात चोच वासून आकाशाकडे व्याकुळपणे बघणारी तीनचार पिल्ले आहेत. अत्यंत हृदयद्रावक असे हे दृश्य आहे. त्या चित्रात वर दूरवर ठिपक्यासारखी दिसणारी पक्षीण पाण्याच्या ढगाला चोचीत धरून जिवाच्या आकांताने ओढीत घरट्याकडे नेत आहे. एवढ्या या एका कृतीतून त्या पक्षिणीची आपल्या पिल्लांना वाचवण्याची चाललेली जिवापाड धडपड प्रभावीपणे व्यक्त होते. आईची अपार माया या चित्रातून दिसून येते.
कृती (३) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
कृती (३) | Q 1.1 | Page 58
1) या चित्रांचे स्रोत मला सापडतात.
SOLUTION
कर्तरी प्रयोग.
2) हा संदेश मला पोहोचवता आला.
SOLUTION
कर्मणी प्रयोग.
3) त्यांनी ती सातआठ चित्रं पुन्हा चितारुन दाखवली.
SOLUTION
कर्मणी प्रयोग.
4) मार्गदर्शन संपवून चहा मागवला.
SOLUTION
कर्मणी प्रयोग.
![रंगरेषा व्यंगरेषा मराठी युवकभारती | Rangaresha vyangresha [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] रंगरेषा व्यंगरेषा मराठी युवकभारती | Rangaresha vyangresha [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEiBj3BA50paWhdDdB46z5_yC6HJHxc_TOeEAC4LZvKOUmZPH8BtvwMUAtrsORl0gFEtB4fNGzxnKk-zMfinGLAhd26B1311Jgr5Tn0eTUXpq5VGBa25o7OR8s5OTIy-K64QX3B02Y0LYk2iLkwIUg9qVYhuJFp1LMhjhTWkx04kWTbRG6cQsCUrCGDd=s16000)
कृती (३) | Q 2 | Page 58
खालील वाक्यांचा प्रकार ओळखून सूचनेप्रमाणे तक्ता पूर्ण करा.
वाक्य | वाक्यप्रकार | बदलासाठी सूचना |
(१) अशी माणसं क्वचितच सापडतात. | | नकारार्थी करा |
(२) ती जुनी कौलारू वास्तू होती. | | उद्गारार्थी करा |
(३) तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही? | | आज्ञार्थी करा. |
SOLUTION
वाक्य | वाक्यप्रकार | बदलासाठी सूचना |
(१) अशी माणसं क्वचितच सापडतात. | विधानार्थी – होकारार्थी वाक्य | नकारार्थी → अशी माणसे बहुतेक सापडत नाहीत. |
(२) ती जुनी कौलारू वास्तू होती. | विधानार्थी वाक्य | उद्गारार्थी → किती जुनी कौलारू वास्तू होती ती! |
(३) तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही? | प्रश्नार्थी वाक्य | आज्ञार्थी → तुम्ही मला बोलू दया. |
कृती (३) | Q 3 | Page 58
समासाचे नाव व सामासिक शब्द यांच्या जोड्या जुळवून लिहा
समासाचे नाव | सामासिक शब्द |
(१) तत्पुरुष समास | (अ) स्त्रीपुरुष, गुणदोष |
(२) अव्ययीभाव समास | (आ) महात्मा, पंचधातू |
(३) बहुव्रीही समास | (इ) प्रतिवर्षी, आजन् |
(४) द्वंद्व समास | (ई) लक्ष्मीकांत, निर्धन |
SOLUTION
समासाचे नाव | सामासिक शब्द |
(१) तत्पुरुष समास | महात्मा, पंचधातू |
(२) अव्ययीभाव समास | प्रतिवर्ष, आजन्म |
(३) बहुव्रीही समास | लक्ष्मीकांत, निर्धन |
(४) द्वंद्व समास | स्त्रीपुरुष, गुण दोष. |
![रंगरेषा व्यंगरेषा मराठी युवकभारती | Rangaresha vyangresha [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] रंगरेषा व्यंगरेषा मराठी युवकभारती | Rangaresha vyangresha [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgfPK3LCRs_GbZbEW6pY4vXxjf8hUg5ByjV0nIBH0AqCs-k7JBevTyAT-JOvvgxQ-XiHNfV4zC0vMgIyylqjFWPB8yasCp7AcPajxsaaK196IkHZido_SPY6aageCvYmm7kQkgKwpL2bL2GglMuTVEFLV_CToAaQ1kUuuoAn6hGSJxC56B6Y7LGOEF6=s16000)
SOLUTION
चहापाणी – समाहार द्वंद्व समास
सद्गुरू – कर्मधारय समास
सुईदोरा – इतरेतर द्वंद्व समास
चौघडी – द्विगु समास
कमीअधिक – वैकल्पिक द्वंद्व समास
जलदुर्ग – विभक्ती तत्पुरुष समास.
![रंगरेषा व्यंगरेषा मराठी युवकभारती | Rangaresha vyangresha [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] रंगरेषा व्यंगरेषा मराठी युवकभारती | Rangaresha vyangresha [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEii-28moc98k-ojHE2XjgBT75TarWmmVRKRft7dsRhtoJgQtjdYNUXp60braVZE_57Iye5VD6aYmcjz5FOkHGbTtmKh-FhyfwmLWRxYgozmivOlayqtqAwqa7lQh2ynTJqGvStg9LVYK6rWG491jbZV3tCZppcMDubvVY_eZ6sC9VBBwKzrt0jgt3dp=s16000)
स्वमत.
‘एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते’, या विधानाशी तुम्ही सहमत वा असहमत अाहात ते सकारण स्पष्ट करा.
SOLUTION
भाषा आणि व्यंगचित्र ही दोन भिन्न माध्यमे आहेत. त्यांचे सादरीकरण भिन्न असते आणि त्यांचे परिणामही भिन्न असतात. आपण घर हा शब्द लिहितो, तेव्हा घर या शब्दाचा आकार पाहून किंवा घर या शब्दाच्या उच्चारातून जो ध्वनी निर्माण होतो, तो ध्वनी ऐकून घराचा बोध होऊ शकणार नाही. फक्त मराठी भाषा समजणाऱ्यालाच घर या शब्दाचा बोध होऊ शकतो. घर शब्दाच्या आकाराशी व उच्चाराशी घर ही वस्तू जोडलेली आहे. ज्याला हा संकेत माहीत आहे आणि ज्याने तो संकेत लक्षात ठेवला आहे, त्यालाच घर या शब्दाचा बोध होऊ शकतो. याउलट, घराचे चित्र दाखवल्यावर ते जगातल्या कोणत्याही व्यक्तीला त्या चित्रातून व्यक्त होणाऱ्या वस्तूचा बोध होतो. तिथे भाषेची आडकाठी येत नाही. देशाच्या सीमा आड येत नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक दर्जाचा संबंध येत नाही. चित्रातून आशयाचे थेट आकलन होते. म्हणून भाषेपेक्षा चित्र आशयाला प्रेक्षकांपर्यंत पटकन व थेट पोहोचवते.
चित्र व व्यंगचित्र यांत काहीएक फरक आहे. व्यंगचित्रात काही व्यक्ती दाखवलेल्या असतात. व्यंगचित्रकार कधीही विषयवस्तूचे फक्त वर्णन करीत नाही. त्याला माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींवर काहीएक भाष्य करायचे आहे. त्या वृत्ती-प्रवृत्ती ठळकपणे लक्षात याव्यात म्हणून माणसांचे चेहेरे, त्यांवरचे हावभाव, त्यांच्या हालचाली यांतील काही रेषा मुद्दाम ठळकपणे चितारतो. त्यामुळे चित्र हे व्यंगचित्र बनते. व्यंगचित्रातून माणसाच्या वृत्ती-प्रवृत्तींवर केलेली टीका कोणालाही पटकन कळू शकते. तोच भाव समजावून सांगण्यासाठी खूप शब्द वापरावे लागतात. खूप शब्द वापरूनही सर्व आशय नेमकेपणाने व्यक्त होतोच असे नाही. व्यंगचित्राच्या बाबतीत असे घडत नाही. तेथे आशय स्पष्टपणे लक्षात येतो.
व्यंगचित्रात चालू घडामोडींवर भाष्य असते. व्यंगचित्र पाहणारा प्रेक्षक चालू घडामोडींचा साक्षीदारही असतो. म्हणून त्याला व्यंगचित्र पटकन कळू शकते.
स्वमत.
'वाहत्या आयुष्यामध्ये सावधगिरीनं उभं राहिलं तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
SOLUTION
कलावंतांविषयी, कलेविषयी सर्वच समाजात विलक्षण कुतूहल असते. व्यंगचित्रकार हाही एक कलावंतच असतो. व्यंगचित्रकाराची व्यंगचित्र दररोज प्राधान्याने वर्तमानपत्रांतून लोकांसमोर येत असतात. दररोज त्याची लोकांशी गाठभेट होत असते. वर्तमानपत्र वाचणारा प्रत्येक वाचक व्यंगचित्र पाहतोच पाहतो. व्यंगचित्र पाहताच त्या वाचकाला त्याचे मर्म खाडकन जाणवते. ते मर्म क्षणार्धात त्याच्या मनात शिरते. चेहेऱ्यावर स्मित तरळते. त्याच क्षणी तो वाचक व्यंगचित्रकाराला मनोमन दाद देतो. किती सुंदर कल्पना आहे ही! कशी सुचली असेल या व्यंगचित्रकाराला? आपल्यासारखाच हा माणूस. हातपाय, नाक, कान, डोळे हे सर्व अवयव आपल्यासारखेच. यांना कशी काय सुचते हे व्यंगचित्र?
लोकांच्या मनातील या प्रश्नालाच मंगेश तेंडुलकर यांनी प्रस्तुत पाठात दोन वाक्यात उत्तर दिले आहे. 'वाहत्या आयुष्यात सावधगिरीने उभे राहिले, तर व्यंगचित्राची कल्पना आपल्या जवळूनच जाताना नजरेस पडेल. तिथून ती उचलायची आणि कागदावर उतरवायची.' त्यांनी अत्यंत सोप्या शब्दांत उत्तर दिले आहे. व्यंगचित्रकार कमीत कमी रेषांमध्ये आपला आशय व्यक्त करतो. तसेच इथे लेखकांनी कमीत कमी शब्दांत आशय व्यक्त केला आहे. वाहत्या आयुष्यात म्हणजे दैनंदिन जीवन जगत असतानाच. त्याच जीवनाचे निरीक्षण केले असता, आपण जगत असलेल्या प्रसंगातच व्यंगचित्राची कल्पना सापडते. या कल्पनेसाठी रानावनात जाऊन वेगळी तपश्चर्या करावी लागत नाही.
मग काय करावे लागते? तर आपल्या जगण्याचेच तटस्थपणाने, त्रयस्थासारखे निरीक्षण करावे लागते. लेखकांनी यासाठीच 'सावधगिरीने' हा शब्द वापरला आहे. सावधगिरीने याचा अर्थ समजून घ्यायला हवा. आपण आपल्या दैनंदिन जीवनात साधारणपणे आपल्या अनुभवांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्यांत पूर्णपणे बुडून जातो. त्यामुळे आपल्या अनुभवाचे मर्म आपल्या ध्यानात येत नाही. म्हणून काही क्षण तरी आपल्या अनुभवांकडे रेंगाळून पाहिले पाहिजे. जो विचार आपल्याला उत्कटपणे सांगावासा वाटतो, त्याला साजेसा प्रसंग आपल्याला दिसतो, असे लेखकांना सुचवायचे आहे. एकदा कल्पना सुचली की चित्र काढणे सोपे असते.
खरे सर्वच कलांच्या बाबतीत हे पूर्णपणे खरे आहे. लेखकांनी खूप गूढ अशा प्रश्नाला साध्या, सोप्या शब्दांत उत्तर दिले आहे.
स्वमत.
लेखकांनी व्यंगचित्रांतून वडिलांना वाहिलेली श्रद्धांजली तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
लेखक मंगेश तेंडुलकर हे अत्यंत मनस्वी वृत्तीचे होते. ते जे काही करायला घेत त्यावर ते उत्कटपणे प्रेम करीत. ते अत्यंत करारी होते. ते ऐहिक सुखसमृद्धीच्या मागे धावले नाहीत. कोणासमोर हात पसरले नाहीत. या सगळ्या गुणांची देणगी लेखकांना मिळाली. आयुष्यात अनेक संकटे आली, वावटळी आल्या. पण त्यांना तोंड देऊन लेखक भक्कमपणे स्वत:च्या पायावर उभे राहिले. हे ते करू शकले कारण त्यांना वडिलांकडून मिळालेला नैतिक वारसा. त्या बळावर आयुष्यात तग धरून राहिले. कोलमडले नाहीत. आपल्याला मिळालेल्या या वारशाबद्दल स्वत:च्या मनात लेखकांना अपार कृतज्ञता वाटत होती. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या वडिलांना व्यंगचित्र मधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली.
ही श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांनी दोन चित्रे काढली. एका चित्रात लेखकांचे बालरूप आहे. बालरूपातले लेखक भर पावसात उभे आहेत. त्यांच्या डोक्यावर 'बाबा' ही दोन अक्षरे आहेत. 'बाबा' या शब्दाच्या दोन्ही बाजूंनी पाऊस पडत आहे. खाली इवलासा मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहे. बाबा या शब्दांनी, म्हणजे बाबांनी त्यांचे रक्षण केले.
दुसऱ्या चित्रात लेखक सरत्या वयातले, वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षातले, उभे आहेत. भर पावसात उभे आहेत. डोक्यावर बाबा हा शब्द नाही. तरीही पाऊस लेखकांना न भिजवता त्यांच्या बाजूने पडत आहे. ते आता पंच्याहत्तराव्या वर्षीही सुरक्षित आहेत. बाबांकडून मिळालेला नैतिक वारसा त्यांच्या मृत्यूनंतर लेखकांना खूप मोठा आधार, आश्रय देत आला आहे. वडिलांबद्दलची ही कृतज्ञता लेखक या व्यंगचित्रातून व्यक्त करू पाहतात. स्वत:च्या पित्याला इतकी उत्कट श्रद्धांजली क्वचितच कोणीतरी वाहिली असेल.
![रंगरेषा व्यंगरेषा मराठी युवकभारती | Rangaresha vyangresha [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] रंगरेषा व्यंगरेषा मराठी युवकभारती | Rangaresha vyangresha [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]](https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjiHo2JCXjutkvUzBCqKauG8ifrZ--niPZN7TcAdGWQKo7m_K1w0lyVfWepshOio7K6L4Lyla5hHBzU7dpwFtpgmzFsQmOk_qT77fSsy4LOlma7ONAOa0_eAzqUVvW3E04ADuJQXrWGcn0fUq-kol6GCs9peQqily9-dj2QWII7nRc7BAfZ4A176AfB=s16000)
अभिव्यक्ती.
'स्त्रीभ्रूणहत्या एक अपराध' याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.
SOLUTION
आपला देश अंधश्रद्धेच्या मगरमिठीत पूर्णपणे अडकलेला आहे. मागासलेल्या विचारांच्या दलदलीत बुडालेला आहे. यामुळे समाजात सामाजिक - सांस्कृतिक दुर्गुण निर्माण झाले आहेत. अत्यंत दुष्ट, अन्यायकारक रूढी-परंपरा निर्माण झाल्या आहेत. या रूढींच्या बरोबरीने समाजाच्या मनात घातक व अन्यायकारक विचार रुजत चालले आहे. त्यांपैकी एक आहे - स्त्री पुरुष समानता. समाजमनात स्त्री ही कनिष्ठ व पुरुष हा श्रेष्ठ अशी धारणा निर्माण झाली आहे. मुलगा हा कुलदीपक व मुलगी परक्याची धनसंपदा, अशी समजूत. मुलगी घरात जन्मणे हे अशुभ. आपल्या हातून पाप घडले असेल तरच आपल्या पोटी मुलगी जन्माला येते, यामुळे घरात मुलगा जन्माला यावा यासाठी लोक धडपड करतात. उपासतापास करतात. लोक मुलगी होणार असेल, तर तिला जन्म होण्याच्या आधीच मारतात. हे सर्रास होत होते. अनेक डॉक्टर यात सामील होते. याविरुद्ध आता कडक कायदे झालेले आहेत. तरीही अधूनमधून हे कृत्य घडताना दिसते.
खरे तर मुलगी जन्मण्याच्या आधीच तिला मारणे, हा खूनच होय. हा एका व्यक्तीचा खून या अर्थाने ही भीषणच घटना आहे. पण हे व्यक्तीच्या मृत्यूपुरते थांबत नाही. यामुळे संपूर्ण मानव जातच धोक्यात येऊ शकते. लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण जास्त आणि स्त्रियांचे प्रमाण कमी या वास्तवामुळे फार मोठे सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत. या प्रश्नांच्या आगीत संपूर्ण समाज होरपळून जाण्याची शक्यता आहे.
या वस्तुस्थितीकडे जरा नीट पाहिले, तिच्यातली विपरीतता स्पष्ट होईल. स्त्रियांची संख्या समाजात सामान्यत: निम्मी असते. आपला अर्धा समाज अन्यायग्रस्त राहिला तर त्याची प्रगती होणार तरी कशी?
स्त्रीभ्रूणहत्येच्या समस्येवर 'डॉक्टर तुम्हीसुद्धा?' या नावाचे नाटकही येऊन गेले आहे. समाजाचा एक भाग या समस्येची भीषणता ओळखून आहे. पण ज्याला कळलेच नाही, असा समाजाचा जो भाग आहे तो खूप मोठा आहे. हा समाजगट कितीही मोठा असला, तरी सुज्ञ लोकांनी याविरुद्ध लढले पाहिजे. स्त्रीभ्रूणहत्या हा खूनच होय. आणि अशी कृत्ये करणारी माणसे खुनी होत, असेच समाजाने मानले पाहिजे. तरच या भीषण रूढीला आळा बसेल.
अभिव्यक्ती.
'आईचं नातं सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे,' या वाक्यातील आशयसौंदर्य उलगडून दाखवा.
SOLUTION
रवींद्रनाथांची एक कथा आहे. एका आईचे आपल्या मुलावर अतोनात प्रेम होते. तिने त्याला कष्टपूर्वक वाढवले. एकदा त्याला देवाचा साक्षात्कार झाला. देवाने त्याला वर दिला, "बाळा काय हवे ते माग." त्याने देवाकडे अमरत्व मागितले. देवाने ही मागणी मान्य केली, पण त्याने एक अट घातली. "मला तू तुझ्या आईचे हृदय आणून दे." बाळाला खात्री होती की आई आपल्याला तिचे हृदय देणारच. तिचे त्याच्यावर अपार प्रेम होते. मुलाने आईकडे येऊन हृदयाची मागणी केली. आईचे हृदय घेतले. आई मरून पडली. मुलगा धावत धावत देवाकडे निघाला. वाटेत त्याला ठेच लागली. त्याच्या हातातले हृदय जमिनीवर पडले. मुलगा हृदय उचलायला धावला तेवढ्यात त्याच्या कानावर शब्द आले, "बाळा, तुला काही लागलं नाही ना?"
ही कथा काल्पनिक आहे, यात शंका नाही. पण या कथेतून आईचे अपार ममत्व, त्यातील उदात्तता, त्यातील शुद्धता, मुलाबाबतची ओढ हे सारे विलक्षण नजाकतीने व्यक्त झाले आहे. आई आपल्या बाळाला नऊ महिने आपल्या कुशीत सांभाळते. तो निव्वळ गोळा असतो, तेव्हा ती स्वत:चे रक्त देऊन त्याचे पालनपोषण करते. खरे तर आपल्याला जसे हात, पाय इत्यादी आपले अवयव असतात, तसाच कोणताही बाळ त्याच्या आईला स्वत:च्या देहाचाच भाग वाटत असतो. त्यामुळे तिच्या आयुष्यातली सगळी शुद्धता, सगळे पावित्र्य त्या नात्यात एकवटलेले असते. बाळाची भूक प्रथम आईला लागते. बाळाला जरा कुठे काही लागले, तर त्याची कळ आईच्या हृदयात प्रथम उमटते. नीट बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की, बाळाच्या वाटचालीकडे, त्याच्या शिक्षणाकडे, त्याच्या प्रकृतीकडे आईचे पूर्ण लक्ष असते. त्याच्या विकासाबाबत ती आत्यंतिक संवेदनशील असते. आईचे प्रेम शुद्ध, पवित्र असते, याचे कारण ती आपल्या बाळासाठी जे काही करते, त्याबदल्यात बाळाकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. म्हणून जगभरात, सर्व मानवी समाजात आई-मूल हे नाते सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे.
रंगरेषा व्यंगरेषा [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
मला व्यंगचित्रांसाठी अखंडपणे विषय मिळत राहणं हा मूळ प्रेरणेचा भाग सुदैवानं माझ्यासाठी कधी अडचणीचा ठरला नाही. विचारांचा पाठलाग करत क्षितिजापर्यंत जाण्याची माझी सवय हा माझा यातला एक महत्त्वाचा स्रोत आहे. ज्या विचाराचा पाठलाग करतो तो विषय हाती लागत नाहीच; पण त्या वाटेवर काय काय नवीन नवीन सापडत जातं, त्याचीच व्यंगचित्रं होतात.
मी बऱ्याच कार्यक्रमांना जात असतो. तिथेही या चित्रांचे स्रोत मला सापडतात. असले कार्यक्रम हे कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत माझे. प्रयत्न केला तर किती चांगले धागे हातात येतात याचं प्रत्यंतर देणारा एक प्रसंग एका अतिशय साध्याशा कार्यक्रमात घडला. प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. तो घेऊन मी टेबलावर ठेवला आणि शांतपणे खुर्चीत बसलो होतो. बोलणारा माझी कुठून कुठून जमवलेली माहिती उपस्थितांना सांगत होता. मला त्यात स्वारस्य नव्हतं. मी टेबलावरच्या नारळाकडे बघत होतो. बघता बघता मला ती नारळाची शेंडी, नारळाचा ताे लहानसा आकार पाचसात वर्षांच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी तिच्या पोनीटेलसारखी बांधलेली! हे स्मरणात घिरट्या घालायला लागलं.
कार्यक्रम संपला. घरी आलो. बाकी सगळी कामं नेहमीसारखी सुरू होती. रात्री दहानंतर मी समोर ड्रॉईंगपेपर घेऊन बसलो होतो. त्यावर चित्र चितारत गेलो ते अशा क्रमानं. देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. नारळ फोडणारा तो पुरुषी हात मी चितारला. तो नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचं डोकं आहे हे सूचित व्हावं म्हणून त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला. त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर उगारलाय आणि त्याचबरोबर मी दुसरा एक हात दाखवलाय ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुषी हात धरून ठेवलाय. स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं. ज्यांना लिहिता-वाचता येत नाही त्यांच्यापर्यंतही हा संदेश मला पोहोचवता आला. त्या समारंभाला मी गेलो नसतो तर मला हे सुचलं नसतं.
व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरंतर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून! त्यात एक समूह असाही आहे, की त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्येजाऊन उभे राहतात. न हलता शांतपणे; पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफिलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातानं झडप घालून ते पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्येजर सावधगिरीनं उभं राहिलं, तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्रं रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते.
अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रं ही नि:शब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं ‘येते’. हे मी स्वत: अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे.
अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक ‘आई’विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्येदिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं, त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचताे म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं.
व्यक्त होण्याची गोष्ट खूप पुढे नेत नेत मी माझ्या वडिलांना माझ्या व्यंगचित्रांमधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली. या चित्रांमधल्या पहिल्या चित्रात मी भर पावसात उभा आहे आणि माझ्या डोक्यावर दोन अक्षरं आहेत ‘बाबा’. पाऊस ‘बाबा’ या शब्दाच्या दोन्ही बाजूंनी पडतो आहे. खाली इवलासा मी सुरक्षित आहे. मी त्यात माझं लहानपण दाखवलंय. दुसऱ्या चित्रात आता ते शब्द नाहीयेत; पण तरीदेखील तो पाऊस माझ्या दोन्ही बाजूंनी जातो आहे. मी तिथे उभा आहे तो आत्ताच्या वयाचा- पंचाहत्तरी पूर्ण केलेला आहे. बाबांनी जे काही माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे ते त्यांच्यामागे आत्तापर्यंत मला खूप मोठा आधार, खूप मोठा आश्रय देत आलं आहे. माझ्या व्यंगचित्रातून मी हेही व्यक्त करू शकलो.
माझ्या व्यंगचित्रांची प्रदर्शनं भरवण्याचे माझे जे जगावेगळे हेतू आहेत, त्यात व्यंगचित्राचा परिचय ‘एक छान भाषा’ म्हणून करून देणं हाही आहे. पुणे, मुंबई, गोवा, दिल्लीपासून महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या शहरांपर्यंत कितीतरी ठिकाणी माझी प्रदर्शनं झाली. या प्रदर्शनांमधला माझा सगळ्यात चांगला अनुभव आहे तो वाईसारख्या छोट्या शहरामध्ये लोकमान्य वाचनालयामध्ये प्रदर्शन भरवलं होतं तेव्हाचा. जुनी कौलारू वास्तू होती ती. उद्घाटन झालं. दुसऱ्या दिवशी मी आणि लता दोघंही खुर्च्या टाकून शांतपणे बसलो होतो. तिथे खाली रस्त्यावर उतरणारा जिना होता. रस्त्यावर एक वीसबावीस जणांची शेतकरी कुटुंबाची ट्रॅक्टरट्रॉली थांबली. तिथे काही दुकानं
होती. मला वाटलं ती मंडळी त्या दुकानांमध्ये आली असतील. मी कुतूहलानं पाहत होतो. मंडळी ट्राॅलीमधून उतरली आणि जिना चढून वर प्रदर्शनाकडे आली. मला बरं वाटलं.
त्यांच्यासोबत सत्तरीच्या आसपासचा कुटुंबप्रमुख होता. पांढऱ्या मिशा, रंग काळाकभिन्न, डोक्याला केवढंतरी मोठं मुंडासं बांधलेलं. नखशिखान्त शेतकरीपण वागवणारा तो आणि त्याच्या घरातली मुलं-नातवंडं प्रदर्शन पाहायला लागली. हा कुटुंबप्रमुख माझ्या प्रत्येक चित्रासमोर उभा राहत होता आणि त्याच्यामागे उभे राहिलेल्या त्याच्या माणसांना अर्थ समजावून सांगत होता. तो काय सांगत होता ते मी शांतपणे ऐकत होतो. तो कुठल्या चित्रासमोर उभा आहे तेही मला दिसत होतं आणि मनाची स्वच्छ पाटी घेऊन आलेल्या या शेतकऱ्यापर्यंत हे चित्र कसं पोहोचतंय हे मी थेट अनुभवत होतो. चित्रं चितारताना माझ्या मनात होतं ते आणि आत्ता त्याच्यापर्यंत पोहोचत होतं ते याच्यात जी तफावत मला जाणवत होती ती तशी का जाणवत होती हे मी मनोमन समजून घेत होतो. हे माझं केवढं तरी मोलाचं शिक्षण होतं, जे मला एखाद्या विद्यापीठातही मिळालं नसतं ते त्या अनोळखी शेतकऱ्यानं त्या दिवशी मला दिलं.
व्यंगचित्रांच्या प्रसिद्धीसाठी प्रारंभीच्या काळात मी केलेली धडपड आठवली, की गंमत वाटते. तेव्हाचा तो काळ मोठा अवघड होता. मासिकं, नियतकालिकं यांना मी सतत चित्रं पाठवायचो आणि ती सतत परत यायची. त्या चित्रांसाठी मी अपार मेहनत केलेली असे, ती स्वीकारली जात नव्हती, त्यांची स्वतंत्र ओळख तयार होत नव्हती या सगळ्यांचा मी बऱ्यापैकी मनस्ताप करून घ्यायचो. नाव नाही म्हणून प्रसिद्धी नाही आणि प्रसिद्धी नाही म्हणून नाव नाही या चक्राच्या तळाशी गोल गोल फिरत होतो. एखादं दुसरं चित्र प्रसिद्ध व्हायचं तर पन्नासएक परत यायची. या काळात तीन संपादकांनी मात्र मला हात दिला. दीनानाथ दलाल हे त्यापैकी एक होते. या श्रेष्ठ चित्रकाराचं ऑिफस मुंबईत केनेडी ब्रीजला होते. तो पत्ता मी त्यांच्याच मासिकावरून उतरून घेतला. त्यांना पोस्टकार्ड टाकलं, मला तुम्हांला भेटायला यायचंय’ असं लिहिलं. मला असं वाटत होतं, की ‘दीपावली’ मध्ये माझी चित्रं प्रकाशित झाली तर बाकीच्या मासिकांतून ती विनातक्रार स्वीकारल जातील. मग मी ‘दीपावली’ साठी खास चित्रं तयार केली. दरम्यान दलालांनी मला भेटीचा दिवस व वेळ कळवली. ठरल्या दिवशी सकाळी जनता एक्स्प्रेसनं मी मुंबईला गेलो.
चर्नी रोडला उतरलो आणि केनेडी ब्रीजला गेलो. दलाल किती वाजता ऑफिसमध्ये येणार आहेत, आलेत का? हे विचारण्यासाठी मी ऑफिसमध्येफोन केला. फोन खुद्द दलालांनी घेतला. ‘नमस्कार, मला दीनानाथ दलालांशी बोलायचंय’ मी म्हणालो. ‘स्पीकींग!’ त्यांचा आवाज इतका स्त्रीच्या आवाजासारखा होता, की दलाल स्वत: बोलत असतील असं मला वाटलंच नाही. मी त्यांना पुन्हा सांगितलं, ‘मला श्रीयुत दीनानाथ दलाल यांच्याशी बोलायचं आहे. मी मंगेश तेंडुलकर.’ ‘स्पीकींग स्पीकींग...’ त्यांनी मंजुळ आवाजात आणखी दोनदा सांगितलं. ‘अहो, मला तुमच्याशी नाही बोलायचं. मला संपादक दीनानाथ दलालांशी बोलायचं आहे. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही?’ माझा आवाज थोडा वाढला. ते मला म्हणाले, ‘अहो तेंडुलकर, मी दीनानाथ दलाल!’ मी किंचितसा अवघडलोच. म्हटलं, ‘तुम्ही ऑफिसमध्ये आहात ना हे विचारायला मी फोन केला.’ ‘हो, आहे मी. या तुम्ही’, ते म्हणाले आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. पहिल्या मजल्यावर त्यांचं ऑफिस होतं.
‘ये. बस.’ अगदी तोच आवाज. टेबलवर इझेल ठेवून ते काम करत होते. माझ्या मोठ्या बंधूंचा-विजयचा आणि त्यांचा परिचय होता. तोपर्यंत विजय लेखक म्हणून प्रसिद्ध झालेला होता. मी प्रथमच त्यांच्यासमोर गेलो होतो. ‘तू विजयचा कोण?’ दलालांनी विचारलं. ‘कुणीही नाही.’ मी क्षणार्धात सांगून टाकलं. काही क्षण भुवया उंचावून गंभीरपणे त्यांनी माझ्याकडे बघितलं. माझ्याकडे बघत म्हणाले, ‘ठीक आहे! दाखव काय चित्रं काढली आहेस?’ माझी व्यंगचित्रं त्यांना दाखवली. ती पाहून त्यांनी मला त्यांच्या खुर्चीच्या मागे येऊन उभं राहायला सांगितलं. राहिलो. दलालांनी कोऱ्या कागदाचे तुकडे ड्रॉईंगबोर्डवर ठेवले. माझं चित्र शेजारी धरून ब्रशच्या फटकाऱ्यांनी त्यांनी ते पुन्हा त्या कागदाच्या तुकड्यांवर चितारलं. म्हणाले, ‘व्यंगचित्रातला नवा ट्रेंड हा असा आहे.
कमीत कमी रेषा, कमीत कमी तपशील आणि त्यातून जास्तीत जास्त आशय. तोही शब्दांशिवाय! तुझी चित्रं चांगली आहेत; पण तुझी पद्धत जुनी झाली आहे आता. चित्राला एक परस्पेक्टिव्ह असतं. सगळी चित्रं सपाट नाही काढायची. त्याला खोली असायला हवी.’ खोली कशी घ्यायची हेही त्यांनी मला दाखवलं. म्हणाले, ‘मी सांगितलेलं लक्षात ठेव आणि ही चित्रं पुन्हा काढून पाठव.’ औपचारिक शिक्षण म्हणतात ते माझं असं दीनानाथ दलालांकडून झालं. पंधरा-एक मिनिटांत त्यांनी ती सातआठ चित्रं पुन्हा चितारून दाखवली. दलालांनी आपलं महत्त्वाचं मार्गदर्शन संपवून चहा मागवला. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता एके ठिकाणी चुकून मी विजयचा एकेरी उल्लेख केला आणि मीच दचकलो.
माझ्याकडे शांतपणे पाहून ते म्हणाले, ‘तू खोटं बोलतोयस हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. कबूल कधी करतोयस त्याची वाट बघत होतो; पण तू असं का म्हणालास? तुझं त्याच्याशी भांडण वगैरे आहे का?’ मी म्हटलं, ‘अजिबात नाही. तो माझा सख्खा भाऊ आहे आणि त्याच्याबद्दल मला खूप आपुलकी आहे; पण त्याच्या खांद्यावर उभं राहून मला मोठं नाही व्हायचं. त्याचा भाऊ म्हणून माझी चित्रं तुम्ही घ्यावीत असं मला वाटलं नाही, म्हणून मी तसं म्हणालो.’ दलाल म्हणाले, ‘मला आवडलं. अशी माणसं क्वचितच सापडतात. तू चित्र तयार करून पाठव. मी घेतो.’ मी पुण्याला परत आलो. दोन दिवसात त्यांना हवी तशी चित्रं तयार केली. पाठवली. पाठवलेली एकूण एक चित्रं ‘दीपावली’ मध्येप्रसिद्ध झालेली पाहून मला अतोनात आनंद वाटला.
रंगरेषा व्यंगरेषा [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]