HSC Board Paper Solutions Check Your Mark

Tuesday, October 5, 2021

Chapter 6 - दवांत आलिस भल्या पहाटीं Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board

Chapter 6: दवांत आलिस भल्या पहाटीं

योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.

१. शुक्राच्या तोऱ्यात म्हणजे -
  • शुक्रताऱ्याच्या तेजस्वी प्रकाशात.
  • शुक्रताऱ्याच्या आकाशी आगमनात
  • शुक्रताऱ्याप्रमाणे उजळणाऱ्या कविमनात
  • शुक्रताऱ्याच्या अहंकारीपणात.
२. हिरवे धागे म्हणजे -
  • हिरव्या रंगाचे सूत
  • हिरव्या रंगाचे कापड
  • हिरव्या रंगाचे गवत
  • ताजा प्रेमभाव
३. सांग धरावा कैसा पारा! म्हणजे -
  • पाऱ्यासारखा निसटणारा अनुभव
  • हातातून निसटणारा पारा
  • पाऱ्यासारखा चकाकणारा
  • पाऱ्यासारखा पारदर्शक असलेला
४. अभ्रांच्या शोभेंत एकदा म्हणजे -
  • आकाशात अल्पकाळात शोभून दिसणाऱ्या ढगांप्रमाणे
  • काळ्या मेघांप्रमाणे
  • आकाशात गरजणाऱ्या ढगांप्रमाणे
  • आकाशात धावणाऱ्या ढगांप्रमाणे

योग्य प्रश्न निवडा

प्रश्न: प्रेयसीच्या दृष्टिभेटीनंतर प्रेयसीविषयी कवींच्या मनात निर्माण झालेले प्रश्न निवडा:

पर्याय:

  1. प्रेयसीचे नाव काय?
  2. ती वळून पाहणे का विसरली असावी?
  3. भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
  4. ती कुठे राहते?
  5. तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
  6. तिने सुंदर वस्त्र परिधान केले आहे का?
  7. तिचे डोळे कोणता इशारा देतात?
  8. तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?

उत्तर:

  • ✓ (२) ती वळून पाहणे का विसरली असावी?
  • ✓ (३) भूतकाळातील प्रेम विसरली असल्यास आता ओळख कशी दयावी?
  • ✓ (५) तिचे लक्ष नसताना तिचे सौंदर्य कोणता इशारा देत असावे?
  • ✓ (७) तिचे डोळे कोणता इशारा देतात?
  • ✓ (८) तळहाताच्या नाजूक रेषांवरून प्रेमाच्या भवितव्याचे भाकीत कोणी करावे?

खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा

१. वर्तमानातील ताज्या आठवणीच जर विरून चालल्या असतील तर अनोळखी झालेल्या गतकाळातील प्रेमाची आता ओळख तरी कशी द्यावी?

उत्तर:
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची दयावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

२. तळहातावरील नाजूक रेषा तरी कुठे वाचता येतात? मग त्यावरून भविष्य काळातील भेटीचे भाकीत तरी कसे करता येईल?

उत्तर:
तळहाताच्या नाजुक
रेषा कुणिं वाचाव्या, कुणी पुसाव्या;

३. विरल, सुंदर अभ्रे अरुणोदयाच्या प्रतीक्षेत असताना अशीच एकदा तू आलीस आणि जवळून जाताना आपल्या आठवणींचा गंध मनात पेरीत गेलीस.

उत्तर:
दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्रांच्या शोभेंत एकदा; जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.

सूचनेप्रमाणे सोडवा

‘पहाटी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर: प्रेयसी दवांत कधी आली?

एका वाक्यात उत्तरे लिहा

१. कवीची प्रेयसी केव्हा आली?

उत्तर: कवीची प्रेयसी भल्या पहाटी आली.

२. डोळ्यांना कवीने दिलेली उपमा कोणती?

उत्तर: कवीने डोळ्यांना 'डाळिंबांचा पारा' ही उपमा दिली.

३. कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं कशी आहेत?

उत्तर: कवीला प्रेयसीची जाणवलेली पावलं तरल व मंद आहेत.

४. प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत आलेली दोन विशेषणे:

उत्तर: प्रेयसीच्या आठवणीसाठी कवितेत 'कोमल' व 'ओल्या' ही दोन विशेषणे दिली आहेत.

५. 'अनोळख्याने' हा शब्द कोणासाठी वापरला आहे?

उत्तर: 'अनोळख्याने' हा शब्द कवीने स्वत:साठी वापरला आहे.

खालील चौकटी पूर्ण करा.

प्रश्न:
कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना कवितेतील तुम्हांला आवडलेले शब्दसमूह कवितेतील छंद
       
उत्तर (Solution):
कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना कवितेतील तुम्हांला आवडलेले शब्दसमूह कवितेतील छंद
प्रत्यक्षात किंवा स्वप्नात प्रेयसीचे येणे व जाणे. प्रेयसीच्या आठवणींचे भावोत्कट वर्णन. आतुरता, उल्हास व व्याकुळता या भावनांचे उत्कट प्रकटीकरण करणे. लक्ष्य कुठे अन् कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा; डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धराया कैसा पारा! अनुष्टुभ मात्रा छंद.

काव्यसौंदर्य व रसग्रहण

'डोळयांमधल्या डाळिंबांचा, सांग धरावा कैसा पारा!' या काव्यपंक्तींचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

'दवांत आलीस भल्या पहाटे' या कवितेत कवी बा. सी. मर्ढेकर यांनी प्रेयसीच्या भेटीतील आतुरता व व्याकुळता यांचे भावोत्कट वर्णन केले आहे. पहाटेच्या वेळी दवभारल्या प्रहरात घडलेली भेट ही प्रत्यक्ष होती की स्वप्नवत होती, यांतील संभ्रम मनोहारी प्रतिमांतून प्रकट केला आहे.

शुक्राच्या तोऱ्यात आलेली प्रेयसी तरल पावलांमधली शोभा पेरीत अगदी जवळून गेली. पण तिला गतकाळातील प्रेमाच्या आठवणी स्मरत नाहीत. ती वळूनही मागे पाहत नाही. तिच्या नजरेमध्ये सुंदरतेच्या खुणा उमटत नाहीत. तिच्या डोळ्यांत प्रेमाची आश्वासक चमक का नाही? हे सांगताना कवीने 'डोळ्यांमधल्या डाळिंबाचे पारा' ही तरळ प्रतिमा वापरली आहे. पारा जसा चिमटीत ठरत नाही, पटकन निसटून जातो. डाळिंबांच्या दाण्यातला पांढरा गर चकाकत राहतो. तसे तिच्या डोळ्यात प्रेम तरळते व नाहीसे होते. प्रेयसीच्या नजरेतील चंचलतेसाठी एक वेगळी, अनोखी व तरल प्रतिमा कवीने सार्थपणे या ओळीत योजिली आहे.

'जवळुनि गेलिस पेरित अपुल्या मंद पावलांमधल्या गंधा' या ओळींमधील भाव सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

कवी बा. सी. मर्ढेकर यांनी 'दवांत आलीस भल्या पहाटीं' या कवितेमध्ये स्वप्नवत येणारी प्रेयसी व गूढपणे तिचे निघून जाणे यांतील कातरता व व्याकुळता सहज पण तरल, संवेदनशील प्रतिमांमधून व्यक्त केली आहे.

पहाटेच्या वेळी शुक्र ताऱ्याच्या तेजाने आसमंत उजळावा तशी आलेली प्रेयसी तरल पावलांमधील शोभा फुलवीत जवळून गेल्याचा भास होतो. गतकाळातील प्रेमभाव तिच्या डोळ्यांत दिसत नाही. कोमल, ओल्या आठवणी तिला स्मरत नाहीत. तळहातावरील रेषा वाचता येत नाहीत. तिचा सारा अनोळखी भाव कवीला व्याकूळ करतो. पहाटेच्या विरळ व धूसर ढगांच्या शोभेत आलेली प्रेयसी जाताना मात्र तिच्या प्रेमाचा गंध मागे दरवळत ठेवून निघून जाते. अभ्रांच्या शोभेत प्रियेचे येणे व निघून जाणाऱ्या मंद पावलांमधला गंध मागे ठरणे, यांतील हृदयस्थ कातर करणारा भाव कवीने उत्कटपणे व्यक्त केला आहे.

प्रस्तुत प्रेमकवितेचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण स्पष्ट करा.

बा. सी. मर्ढेकर यांच्या बहुतांश कविता मानवी जीवनातील नगण्यता व वैफल्यग्रस्तता चितारीत करणाऱ्या आहेत. त्या भावोत्कट आहेतच पण चिंतनशीलता हा त्यांचा स्थायीभाव आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तुत 'दवांत आलीस भल्या पहाटीं' ही कविता वेगळी ठरते. प्रेमभावनेने ओथंबलेली ही कविता त्यातील व्याकूळतेमुळे मनाला भिडते. प्रेयसीचे येणे व जाणे हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे, हा संभ्रम कवितेच्या प्रत्येक कडव्यात तरळत राहतो. गतकाळातील प्रेमाची तिला विस्मृती झाली आहे की काय? प्रेमीजीवनात विरह प्रबळ ठरतो का? प्राक्तनाच्या रेषा चुकीच्या असतात का? नजरेतील प्रेम भाव हरवून आठवणी बुजून जातात का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न या कवितेत निर्माण होतात व प्रेम जीवनातील हतबलता प्रकर्षाने काळजाला पोखरत नेते. शेवटी स्मरणगंध उराशी जपावा हेच कवीचे भागधेय (नशीब) ठरते.

समकालीन प्रेमकवितेतील आनंददायी उत्कट आविष्कार, प्रस्तुत कवितेत दिसून येत नाही, प्रेमभावनेचा वेगळा दृष्टिकोन या कवितेत प्रत्ययास येत असल्यामुळे ही प्रेमकविता वेगळी व अनोखी ठरली आहे.

‘दवांत आलिस भल्या पहाटीं’ या कवितेचे रसग्रहण करा.

प्रेयसीचे आगमन व निर्गमन हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे, याचे व तिच्या सौंदर्याच्या विभ्रमांचे भावोत्कट आलेखन करणे ही 'दवांत आलीस भल्या पहाटे' या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. प्रेयसीच्या भेटीची आतुरता व त्यातील कातर व्याकूळता हा या प्रेमकवितेचा स्थायिभाव आहे.

शुक्राच्या तेजस्वी आभेमध्ये तोऱ्यात येणारी प्रेयसी विरळ, धूसर अभ्रांच्या शोभेत स्मरणगंध मागे ठेवून निघून जाते. या दरम्यानची मानसिक घालमेल कवीने उत्कट व अनोख्या प्रतिमांमधून साकार केली आहे. अनेक गूढरम्य भावनांचे जाळे या कवितेत कवीने विणले आहे. समकालीन प्रेम कवितेत आढळून न येणाऱ्या वेगळ्या भावरम्य प्रतिमा कवीने या कवितेत मांडल्या आहेत. 'प्रेमभावनेचे हिरवे धागे', 'डोळ्यांमधील डाळिंबांचा पारा', 'आठवणींची रांग', 'तांबुस नखांवरील शुभ्र चांदण्या', 'पावलांचा गंध' इत्यादी भावगर्भ प्रतिमांतून प्रेमभावनेतील व्याकूळता प्रत्ययकारी रीतीने प्रकट झाली आहे. रसिकाला खिळवून ठेवणारी ही प्रतिसृष्टी केवळ अनोखी आहे.

प्रेमात बुडून गेलेल्या जिवासाठी प्रेयसीचे अनोळखी वर्तन हृदयाला पीळ पाडणारे आहे. तसेच प्रेमातील हेच भागधेय आहे की काय? प्रेमाची परिणती विरहात होते का? केवळ उराशी स्मृती व प्रेमगंध जपणे हीच प्रेमाची अपरिहार्यता असते का? इत्यादी चिंतनशील आशय या कवितेतून दृग्गोचर होत राहतो.

'अनुष्टुभ' छंदात बांधलेली ही यमकप्रधान रचना तिचा अंतर्गत नाद व लय यांमळे रसिकाच्या ओठांत गुणगुणत राहते.

Other Chapters from Yuvakbharati 11th Standard

Chapter 6 - दवांत आलिस भल्या पहाटीं Balbharati solutions for Marathi Chapter 6 - दवांत आलिस भल्या पहाटीं Balbharati solutions for Marathi Chapter 6 - दवांत आलिस भल्या पहाटीं Balbharati solutions for Marathi Chapter 6 - दवांत आलिस भल्या पहाटीं Balbharati solutions for Marathi

No comments:

Post a Comment